नवरा लक्ष देत नाही, म्हणून तिने मित्राला मॅसेज केला.. आणि..,

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! निशा, निशु अग लक्ष कुठय तुझं आज? मला उशीर होतोय टिफिन देतीयेस ना? श्रीधरचा गेले १० मिनिटांपासून हाच सूर होता. पण आज निशाच खरचं लक्ष नव्हतं रोज सारख. तिने टिफिन रोजसारखा हातात न देता श्रीधर नाश्ता करत बसलेल्या डायनींग टेबल वर ठेवला. श्रीधर ने काय झालं विचारल्यावर ती म्हटली श्री आज संध्याकाळी बाहेर जाऊयात का रे दोघेचं. मला जरा ऍकचुली जरा नाही जास्तच कंटाळा आलाय रुटीनचा.

तिला नेहमी मिळत आलेला आणि माहीत असलेलाच रिप्लाय दिला तिच्या श्री ने, अग नाही गं जमणार आज नेमका लेट पर्यंत क्लाईन्ट कॉल नंतर मीटिंग, डिसक्शन अस बरंच काही आहे. इन्फॅक्ट रोज पेक्षा आज मी उशिराही येऊ शकतो घरी. तुम्ही जाऊन या ना, मुलं आईबाबा त्यांना घेऊन जा. तुलाही स्वयंपाकापासून सुट्टी आणि त्यांना ही चेंज. तरी निशा पुढे बोललीच पण मला तुझ्या सोबत वेळ घालवायचाय.

संडेला असेही आपण सगळे बाहेर जातोच मुलं, आईबाबा घेऊन. आपण दोघे बरेच महिने झाले दोघेच असे बाहेर गेलोच नाही. श्रीधरचा नाश्ता संपला तशी त्याची वेळ बोलायची वेळ ही संपली. अच्छा बघू, आज तर पॉसीबल नाही. चला मला उशीर होतोय बाय म्हणून तो गेला सुद्धा.

निशा पुढचे दहा मिनिट बसूनच होती पुढे तिच्या मनात नसतानाही तिने दुपारचा स्वयंपाक, भांडी, केर, फरशी आणि अशी बरीच घरकाम केली मुलांना शाळेतून आणायच्या वेळेपर्यंत. आज घरात सगळ्यांच्याच लक्षात आलेलं की हीच काहीतरी बिनसलय. अगदी तिच्या ७ वर्षाच्या मुलाला आणि ५ वर्षाच्या मुलीलाही कळलं होत मम्माचा आज मूड छान नाही आहे. खाऊन पिऊन झोपुन घ्या म्हणताच त्यांनी झोपुनही घेतल.

माझा नोकरी न करण्याच्या निर्णय चुकलाय का? शिक्षणाचा उपयोग घर आणि मुलं सांभाळताना करण्याचा निर्णय चुकलाय का? घरकामाला बाई न ठेवण्याचा निर्णय चुकलाय का? की, श्री सोबत लग्नाचाच निर्णय चुकलाय? छे, छे काहीही येतंय हा आता माझ्या मनात. उगाच निगेटिव्ह विचार येतायेत. अशी ती स्वतःशीच स्वतः मनातल्या मनात संवाद करत होती. आणि मग भूतकाळात रमली.

कसे आपण आईच्या हातचा गरमागरम नाष्टा करून आयता टिफिन घेऊन ऑफिससाठी बाहेर पडायचो. कसे शनिवार रविवारचे प्लॅनिंग करायचो. अचानक तिच्या लक्षात की, लग्नाआधी श्री जास्त वेळ माझ्या वाट्याला यायचा आता एका घरात राहून तो मला भेटत नाही. रात्री श्रीधर उशिराच आला झोपताना फक्त म्हटला की सॉरी निशु सकाळी वेळ नव्हता बोलायला मला कळतंय गं तुझं म्हणणं पण खूप बिझी होतो गं मी. आणि शनिवारी आठवड्याचा आळस रविवारी मुलं आईबाबा आणि मग आपला आपल्याला वेळ नाहीच मिळत. निशा ह्यावर काहीच बोलत नाही म्हटल्यावर तो झोपेच्या आहारी कधी गेला ते त्याच त्यालाच कळलं नाही.

पुढचे २ दिवस निशा थकलेली आणि उदासच होती नकोच वाटत होत तिला हे सगळं रोज मुलांना तयार करा, नवऱ्याला तयार करून ऑफिसला पाठवा घरातल्या बाकी फॅमिली मेंबर्सच बघा. पहिले पाच वर्ष मजेत केलं सुद्धा तिने सगळं पण तोचतोचपणा आल्यावर नको वाटू लागलंय सगळं. तिला आज जाणीव झाली की आपण गेली ९ वर्ष हेच सगळं करतोय. आणि तिला “त्याची” आठवण आली खूप खूप आठवण आली.

किती चांगला होता तो किती समजून घ्यायचा मला किती प्रेम करायचा माझ्यावर मला भेटण्यासाठी म्ह्णून ७/७ तास प्रवास करून यायचा. तिच्या मनात हव्यास उतपन्न झाला आणि करावा का “त्याला” कॉल म्हणून मोबाईल हातात घेतला नंबरही काढला पण थांबवलं स्वतःला इतक्या वर्षांनी असा कॉल? कस वाटेल? बरं दिसेल का? पण ती नाही जास्त वेळ थांबवू शकली स्वतःला आणि निदान मेसेज तरी करावा म्हणून टाईप केलं “कसा आहेस”? रिप्लाय ची वाट पाहत होती पुढच्या 10 मिनीटात रिप्लाय आला….

Hey hi, मी मस्त तू सांग कशी आहेस??” मेसेज ट्यून होताच तिने पाहिला. का जाणे तिला बर वाटलं. आणि पुढचा मेसेज आपसूक बायको, मुलं एकंदरीत कुटूंब कसं आहे आणि काय म्हणतिये लाईफ? असा होता.त्यावर रिप्लाय आला “सगळेच एकदम मस्त, पण तू कुठे गायब झालीस लग्न झाल्यापासून? आणि आज एकदम मला असा मेसेज?” “अरे लग्नानंतर सगळेच गायब होतात, तू नाही का झालास?” अस जुजबी ऊत्तर पाठवून तिने बिझी नसतानाही बिझी असल्याचा मेसेज पाठवून बोलणं तात्पुरतं तरी थांबवलं.

आणि गालातल्या गालातच हसली आणि लाजली सुद्धा. का कोण जाणे तिला ह्या २/३ मेसेजेसने छान वाटू लागलं त्याच्याशी बोलत राहावं अस वाटू लागल. आणि काही काम आवरून २ तासाने मोबाईल काहीसा आशेनेच हातात घेतला तिने. अपेक्षित तसा मेसेज होताच “ठीक आहे फ्री झालीस की मेसेज करग बोलू, खर सांगतो इतक्या वर्षांनी असा तुझा असा मेसेज पाहून खूप बर वाटलं, आपण एकत्र घालवलेले “आपले” जुने दिवस आठवले” रिप्लाय न करता ती भूतकाळातल्या गोड आठवणीत रमलीच होती की श्रीने बजावलेल्या डोअर बेलने  वर्तमानात आली. दार उघडून त्याला स्मित हास्य देऊन तिच्या कामाला लागली. रात्री सगळं आवरल्यावर ती दुपारचे सगळे मेसेज सारखी वाचून पाहत होती आणि त्या आनंदातच झोपी गेली.

पुढचे दोन दिवस असेच छान गेले मेसेज मेसेज खेळण्यामध्ये. घरातलं सगळं करून, मुलांशी आनंदाने त्यांच्या आवडीचे खेळ खेळून, तेही खुश राहून हा भलताच खेळ खेळत होती. मध्ये मध्ये स्वतःला विचारतही होती, आपण काय करतोय? बरोबर करतोय ना? मग तीच दुसर मन सांगायच बरोबर करतीयेस तुला फ्रेश वाटतंय ना? ते महत्त्वाच आहे. दुसऱ्या दिवसातला शेवटचा मेसेज त्याने टाकला होता “भेटुयात का?” दोन मिनिटं विचार करून रिप्लाय दिला,”अरे,अस अचानक कसं भेटणार? माझा नवरा, मुलं आहेत आता. त्यांचं रुटीन माझ्यावर अवलंबून असतं”.

त्याचा रिप्लाय त्याच्या स्वभावसारखा नटखट वैगेरे तसाच काहीतरी “अगं मी कुठे म्हटलं सहकुटुंब भेटुयात तू आणि मी भेटुयात.(दोघेचं) पूर्वीसारखे”. रिप्लाय पाहून तिला आपल्या आत म्हणजे मनात काहीतरी होत असल्याचे जाणवले. तरी आजच्या दिवसाचा शेवटचा मेसेज म्हणून तिने रिप्लाय केला, “आपण पूर्वीचे नाही राहिलो आता”.
एक दिवस हो /नाही करता करता भेटायचं ठरलं उद्या संध्याकाळी. खूप खुश झाली निशा.

दुसरा दिवस म्हणजे आज दिवसा भराभर सगळी काम उरकून स्वतःचे सौंदर्य अजून कसे खुलवता येईल ह्यावर जास्त वेळ घालवला. मुलांना कराटे क्लासला सोडून पुढे निघायचं ठरवलं, तसा तिने ‘त्याला’ मेसेजही केला. श्री आणि आईबाबांना सकाळीच सांगितलं होत की मी बाहेर जाणार आहे येताना बाहेरून जेवणाचं पार्सल घेऊन येईल तसं श्रीला काहि आठवल्यासारखं तो म्हटला अरे हो माझी आज संध्याकाळी महत्वाची मीटिंग उशिरापर्यंत आहे, तू कुठे भेटणार असशील तर सांग एकत्र घरी येऊ.

तेव्हा ती फक्त ‘नको’ म्हटली. मुलांना येताना घेऊन ये असा मेसेज श्री ला केला आणि आज निघताना ती वेगळी तयार झाली होती, खास वगैरे म्हणतात तसं. त्याच्या आवडीच्या रंगाचा गाऊन आणि तिला आश्चर्य वाटलं आपल्याला अजूनही त्याच्या आवडी लक्षात आहेत. शेवटचं आरशात पहाताना तिला मंगळसूत्र दिसलं आणि त्याचा आजचा मेसेज आठवला की ” मंगळसुत्र नको घालूस, आपण पूर्वीसारखेच भेटुयात” तिला तो मेसेज आवडला नव्हताच पण मनाच्या हव्यासापोटी तिने मंगळसूत्र काढून ठेवलं.

त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या ठिकाणी ती बसलीच होती त्याची वाट पाहत. त्याने सुद्धा त्याच्या सवयीनुसार तिला पाठून हळूच धक्का देत तिच्या शेजारी जाऊन बसला. तशी म्हणाली, काय हे इतक्या वर्षांनी सुद्धा तू पाठून धक्का दिलासच मला. हो मग तूच म्हणयचीस ना ह्याचसाठी मी उशिरा येतो. आठवतंय ना. तशी ती लाजली आणि तिला पुन्हा आपल्या आत काहीतरी होत असल्याचे जाणवले. त्याने तिचा अवघडलेपणा तिच्या न कळत घालवला,त्याचा स्वभाव तसा होता.

छान गप्पा रंगल्या त्याच्या, कुटुंबाबद्दल मुलांबद्दल जुजबी बोलून त्यांच्या जुन्या आठवणी गप्पा म्हणून पुढे येत होत्या. तुझी बायको काय म्हणते म्हटल्यावर तो म्हटला छान आहे ती. ये पण माझ्या बायको मुलांबद्दल पुढच्या भेटीत सांगतो आज आपण आपल्या बद्दलच जास्त बोलूयात जे तिला थोडस नव्हतं आवडलं पण ते दोघ एन्जॉय करत होते एकमेकांची कम्पनी. निशाला आज खूप खूळ मोकळं आणि फ्रेश वाटत होत. थंड वारा, समोर वाहत पाणी आणि मी ज्याला आवडते सोबतीला “तो”.

तेव्हड्यात काय झालं कळलं नाही पण ३/४ पोलीस मामा धावत आले आणि आणि तिथे असलेल्या जोडप्यांना पोलीस गाडीत बसवायला लावत होते त्यात हे जोडपं पण होत. आता काय दोघांची पंचाईत झाली, तो चार चार वेळा सांगतोय अहो साहेब आम्ही निव्वळ गप्पा मारत बसलो होतो. का नेताय आम्हाला? अरे पोरा सगळे असेच म्हणतात चल बस गाडीत गुमान. निशाचा प्रसन्न असलेला चेहरा रडवेला झालेला पाहुण त्याला मनापासून दुःख झालं शेवटी ती न राहून म्हटली, अहो मामा आम्ही “नवरा-बायको” आहोत ओ प्लीज ऐकून घ्या. तसा तो चमकला.

मग मामा म्हटले मराठी बोलताय मग मंगळसूत्र कुठंय.? दुरुस्तीला दिलंय असंही मी नाही घालत नेहमीच. पुरावा काय मॅडम. तीला आठवलं आपल्या इमेलवर आपलं मॅरेज सर्टिफिकेट आहे ते आणि दोघांची ओळखपत्र पाहून मामा म्हटले नवरा- बायको ला जाण असती कुठं कस वागावं म्हणून सोडतोय, घरीच मारत जाकी राव गप्पा. आणि ते निघून गेल्यावर हे दोघे पुढचे २/३ मिनिट नुसते हसत सुटले होते. अडकवल होतंस मला आज, तू म्हणे मंगळसूत्र नको, चल हात लावू नकोस, निशा म्हणाली “श्री” म्हणजे तिचा “तो” अजून तिच्या हातावर टाळ्या देत हसतच होता. चला मी जेवण घेऊन येते तू मुलांना घेऊन ये. तो हो म्हटला आणि तिला डोळा मारून म्हणतो “पण मजा आली ना आज”

दोघेही आपापली काम करून पोहचली. आज मुलं हिला येऊन बिलगायच्या आधी ही त्यांना जाऊन बिलगली, घरात जेष्टांचा नाराजीचा सूर होता. इतकी तयार होऊन एकटीने बाहेर फिरायला जाणं, मंगळसूत्र न घालणं, त्यात जेवण बाहेरून आणणं अशी बरीच कारण होती नाराजीची. पण पण आज तिच्याकडे ह्या नाराजीकडे दुर्लक्ष कारायची अजब ताकद होती. खुश होती आनंदी होती. जेवताना मधेच  दोघे एकमेकांना स्मित हास्य देत होते. त्याच गुपित त्यांनाच माहीत. आज कित्येक दिवसांनी श्री जेवणानंतरच्या अवरावरीला हातभार लावत होता. त्यामुळे घरातली नाराजी आणि कुतूहल दोन्ही वाढतच होत पण हे दोघे आपले त्यांच्याच विश्वात रममाण. नव्याने प्रेमात पडल्यासारखे. किचनमध्ये निशाने न राहून विचारलंच आज काय विशेष? बऱ्याच दिवसांनी मदत?

त्याच उत्तर, हो आज बऱ्याच वर्षांनी मला माझी “ती” भेटली. नेहमीप्रणे “ती” लाजली आणि “तो” तिला पाहत राहिला. आयुष्यात तोचतोपणा आला की, कंटाळून जातो माणूस मग तो कुणीही असो. खूप जवळच्या आणि ओळखीच्या माणसाला एक दिवसासाठी किंवा एका तासासाठी अनोळखी करून पाहा, नवीन दृष्टी मिळते त्याला पाहायला. एकमेकांची एकमेकांना नव्याने ओळख होते.

कंप्युटर असो वा मोबाइल अशा बऱ्याच मशिनरीला सुद्धा REBOOT ची गरज असते, आपण तर जिवंत माणसं आहोत. मान्य आहे सगळंच रीबूट नाही होणार पण थोड्याफार प्रमाणात करुच  शकतो आणि रिफ्रेश होऊ शकतो आणि अशीच रिफ्रेशमेन्ट देत राहावी स्वतःला सोबत स्वतःच्या माणसांना. करताय ना मेसेज “कसा आहेस” किंवा “कशी आहेस”. ट्राय तर करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

Leave a Comment